चर्चा नको, आमचे पैसे द्या!’ – बीडमधील मल्टीस्टेट ठेवीदारांचा संतप्त सवाल; अधिवेशनात प्रश्न निकाली काढण्याची मागणी
==================
गेवराई (प्रतिनिधी):बीड जिल्ह्यातील मल्टीस्टेट आणि मल्टिनिधी बँकांच्या महाघोटाळ्यामुळे लाखो सामान्य ठेवीदारांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. “शासन स्तरावर या विषयावर वारंवार चर्चा, बैठका आणि आश्वासने झाली; मात्र प्रत्यक्षात अडकलेल्या रकमेचा एक पैसाही अजून ठेवीदाराला मिळाला नाही,” असा संतप्त सवाल आता हताश झालेले ठेवीदार विचारत आहेत.जिल्ह्यातील बेकायदेशीरपणे बंद पडलेल्या पतसंस्थांच्या चौकशीसाठी शासनाने समित्या नेमल्या, परंतु त्याची ठोस अंमलबजावणी अद्याप जमिनीवर दिसलेली नाही. यामुळे ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला आणि गरीब शेतकरी ग्राहकांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी वणवण भटकावे लागत आहे.या प्रकरणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, बीड जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी प्रशासकीय दिरंगाईवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले:”शासन केवळ कागदी चर्चा करते, पण जमिनीवर एकही ठेवीदार समाधानी नाही. अनेक ज्येष्ठ नागरिक पैशांभावी औषधोपचाराविना आहेत. कित्येक कुटुंबे रस्त्यावर आली असून मुलांची लग्ने व शिक्षण थांबले आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून शासनाने आता केवळ आश्वासने न देता कृती करावी.”


