*लाडक्या बहिणींना एसआयआर प्रक्रियेचा प्रचंड त्रास – एस.एम.युसूफ़*
*लाडक्या बहिणी जिथे राहतात तिथेच त्यांची नोंद एसआयआर मध्ये घ्या*
बीड (प्रतिनिधी) – सध्या राज्यभरात एसआयआर अर्थातच स्पेशल इंटेन्सिव्ह रिविजन प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेसाठी शासनाकडून घालून दिलेल्या अटींचा लाडक्या बहिणींना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होत असून लाडक्या बहिणी जिथे राहतात तिथेच त्यांच्या नावाची नोंद घ्यावी आणि त्रासदायक नियम व अटी रद्द कराव्यात अशी मागणी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
याविषयी पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दिनांक १ मार्च २०२६ पासून शासनाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिविजन अर्थातच एसआयआर प्रक्रियेची अंमलबजावणी सुरू केली आहे. यासाठी सन २००० च्या मतदार यादी प्रमाणे नोंदी घेण्याचे आदेश बीएलओंना देण्यात आलेले आहेत. याकरिता नेमण्यात आलेले बीएलओ महिना संपला तरी अजूनही मतदारांच्या घरोघरी पोहोचलेले नाहीत. काही बीएलओ एखाद्या प्रभागात एखाद्या जागेवर बसून एसआयआर ची प्रक्रिया उरकून घेत आहेत.
मतदार यादी मध्ये अगोदरच मतदारांची नावे, पत्ते आणि वय यात खूप चुका आहेत. तसेच महिला मतदारांना एसआयआर मध्ये नाव नोंदणी करिता मोठ्या प्रमाणात प्रचंड त्रास होत आहे. २६ वर्षांपूर्वी त्या जिथे राहत होत्या तेथील मतदार यादी मधून त्यांची नावे काढायची आणि सध्या जिथे राहतात तेथील मतदार यादी मध्ये नोंद करायची. याकरिता पूर्वीचा रेकॉर्ड सध्याच्या राहत्या ठिकाणी आणायचा आणि तो बीएलओंना दाखवून मग त्यांची नोंदणी करायची. अशी ही क्लिष्ट प्रक्रिया शासनाने लाडक्या बहिणींच्या माथी मारली आहे.
शिवाय बरेच बीएलओ कामचुकारपणा करत अनेक महिला मतदारांची नावे जुन्या यादीतून जशीच्या तशीच उचलून जिथल्या तिथे मॅपिंग करू लागले आहेत. वास्तविक पाहता सन २००० साली ज्या महिला मतदार (तरुणी) आपापल्या माहेरी वास्तव्यास होत्या, तेथील मतदार यादी मध्ये त्यांची नावे आजही जशीच्या तशीच आहेत. अशा महिलांची नावे एसआयआर प्रक्रिये करिता नियुक्त केलेले अनेक बीएलओ जशीच्या तशी घेऊन मॅपिंग करू लागले आहेत. एकदा नावाचे मॅपिंग झाले की, मग त्या महिला आजमीतिला जिथे वास्तव्यास आहेत तिथे त्या महिला मतदारांची नावे एसआयआर प्रक्रियेत मॅपिंग होईना. यामुळे महिला वर्गात मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे.
ही बाब जेव्हा समोर येऊ लागली तेव्हा अशा महिला पूर्वी वास्तव्यास असलेल्या ठिकाणी जाऊन तेथील मतदार यादीतून त्यांची नावे अनमॅप करण्याकरिता बीएलओ चा शोध घेत असताना असे बीएलओ शोधूनही सापडेनासे झाले आहे.
मुलींच्या लग्नानंतर जेव्हा ती सासरी जाते तेव्हा प्रत्येक महिलेचे आणि पुरुषाचे दोन्हीकडच्या म्हणजेच सासर आणि माहेर संबंध चांगले असतीलच असे नाही. नातेसंबंध टिकवताना अनेकदा खटके उडून एक दुसऱ्याच्या गावी जाणे, घरी जाणे बंद होऊन जाते. एवढेच काय एक दुसऱ्यांचे तोंड सुद्धा पाहत नाहीत. अशा अवस्थेस तोंड देणाऱ्या मतदारांना एसआयआर प्रक्रियेसाठी शासनाने घालून दिलेल्या अटी या महिला वर्गास म्हणजेच लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणात त्रासदायक व जाचक ठरू लागल्या आहेत.
ज्यामुळे एसआयआर प्रक्रियेनुसार तयार करण्यात येणाऱ्या मतदार याद्यांमधून अनेक महिला मतदारांची म्हणजेच लाडक्या बहिणींची नावे कपात होण्याची शक्यता अजिबात नाकारता येणार नाही.
याकरिता महिला मतदार अर्थातच लाडक्या बहिणी यापूर्वी कुठेही राहणाऱ्या असोत आजमीतिला त्या जिथे वास्तव्यास आहेत तिथेच त्यांच्या नावाची नोंद घेऊन तेथील मतदार याद्यांमध्ये त्यांचे नाव कोणतेही जाचक नियम व अटी न लावता समाविष्ट करून घ्यावेत. अशी मागणी मुक्त पत्रकार एस एम युसुफ यांनी पाठविलेल्या या निवेदनातून केली आहे.


