मुख्याधिकारीविना माजलगाव नगरपालिका :- नुमान चाऊस
माजलगाव (प्रतिनिधी): माजलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने प्रशासनावर प्रभावी नियंत्रण नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मुख्याधिकारी वारंवार रजेवर असल्याने यापूर्वीही नगरपालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला होता. आता पद रिक्त झाल्याने वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे प्रशासनाची पारदर्शकता व उत्तरदायित्व धोक्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
या पार्श्वभूमीवर मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी बीडचे जिल्हाधिकारी यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून माजलगाव नगरपालिकेत प्रामाणिक, अनुभवी व पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच, मुख्याधिकारी पद रिक्त असताना झालेल्या महत्त्वाच्या प्रशासकीय निर्णयांचे परीक्षण करून आवश्यक असल्यास निष्पक्ष चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.
माजलगावसारख्या महत्त्वाच्या शहरात सक्षम प्रशासकीय नेतृत्व नसणे ही गंभीर बाब असून, जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा नागरिकांना लोकशाही मार्गाने आंदोलनाचा विचार करावा लागेल, असा इशारा नुमान अली चाऊस यांनी दिला आहे.


