*देशात आतापर्यंत कोणत्याच सरकारला जमले नाही ते मोदी सरकारने करून दाखवले – सलीम जहाँगीर*
*अल्पसंख्याक मंत्रालयासाठी 3400 कोटींची तरतूद ; मुस्लिम समाजाच्या हिताचा विचार*
बीड:(खान अस्मा रईस खान)
आतापर्यंत कोणत्याच सरकारला जमले नाही ते पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी करून दाखवले आहे. देशाच्या इतिहासात आजपर्यंत कधीच झाली नाही एवढी तरतूद अल्पसंख्यांक मंत्रालयासाठी करण्यात आली आहे. तब्बल 3400 कोटींची तरतूद करत मोदी सरकारने देशातील तमाम मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्यांक समाजाच्या आर्थिक उन्नतीचे उद्दिष्ट समोर ठेवले. मोदी सरकारचा हा निर्णय मुस्लिम समाजाला विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारा असल्याचे भाजपचे प्रदेश महामंत्री सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भाजप नेत्या पंकजाताई मुंडे, डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणात विकासाच्या प्रवाहात येऊ लागला आहे असेही सलीम जहाँगीर यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाच्या अर्थसंकल्प 2026 -27 संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात अल्पसंख्याक कार्य मंत्रालयासाठी 3400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम मागील आर्थिक वर्षातील 3 हजार 395 कोटींच्या तुलनेत 4.38 कोटींनी अधिक आहे. या तरतुदीतून सरकारचा संदेश स्पष्ट आहे की अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला सातत्याने प्राधान्य दिले जाणार आहे. अल्पसंख्याक मंत्रालयाची तरतूद 2026-27 साठी तरतूद 3 हजार 400 कोटी
2025 – 26 मध्ये 3 हजार 395 कोटी एवढी करण्यात आली होती. अल्पसंख्याक मंत्रालयाच्या एकूण बजेटपैकी केंद्रीय क्षेत्र योजनांसाठी 184.45 कोटी (2025 मध्ये 180.07 कोटी होते), मुख्य योजनांसाठी सुमारे 2 हजार कोटी आणि प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमासाठी 1 हजार 197 कोटी रुपयांची तरतूद असेल. या निधीतून शिक्षण, आरोग्य, निवास आणि सामुदायिक पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे. प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम अंतर्गत शाळा, वसतिगृहे, आरोग्य केंद्रे आणि सामुदायिक इमारतींचा विकास आणि दुर्बल व मागास घटकांना थेट लाभ मिळेल. तर, महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमधून नेतृत्व क्षमता विकास, आर्थिक साक्षरता आणि आत्मविश्वास वाढीसाठी प्रशिक्षण अशा विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ मुस्लिम समाजातील महिलांनाही मोठ्या प्रमाणात मिळत असून, महिलांचे आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू असल्याचे सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे.


