शिक्षण महर्षी गोविंदराव वाघ उर्फ नाना यांचे कार्य आणि विचार पुढील पिढीसाठी प्रेरणादायी, नाना देहाने नसले तरी विचारांनी सदैव सोबत — गणेशराव वाघ
शिक्षण महर्षी गोविंदराव वाघ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
बीड (प्रतिनिधी): जीवनात कार्य करताना अडचणी येतातच; मात्र खचून न जाता खंबीरपणे लढत राहणे हेच यशाचे खरे गमक आहे. शिक्षणमहर्षी गोविंदराव वाघ उर्फ ‘नाना’ यांनी दिलेली ही प्रेरणादायी शिकवण आजही समाजाला मार्गदर्शक ठरत आहेत. म्हणूनच नानांच्या विचारांचा आणि कृतीचा वारसा घेऊन त्यांनी सांगितलेल्या सन्मार्गानेच आपण आपले काम करत राहू. नाना आज देहाने आपल्यात नसले तरी विचाराने आपल्यासोबत कायम आहेत,” असे भावूक प्रतिपादन शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गणेशराव वाघ यांनी शिक्षणमहर्षी गोविंदराव वाघ ‘नाना’ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून
बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुदामतीताई वाघ (मोठ्याबाई), नामदेवराव वाघ, बाळासाहेब धुमाळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव शिक्षण महर्षी गोविंदराव वाघ यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने रविवार दिनांक 8 मार्च रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षण महर्षी स्व. गोविंदराव वाघ उर्फ नानांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर काही निवडक मान्यवरांनी नानांच्या संपूर्ण आयुष्यावर, कार्यावर विचार मांडले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना गणेशराव वाघ सर यांनी शिक्षण महर्षी गोविंदराव वाघ उर्फ नाना यांचे संपूर्ण जीवन चरित्र उपस्थितांच्या समोर उलगडले. यावेळी बोलताना गणेश वाघ सर म्हणाले की, बीड तालुक्यातील नाळवंडी सारख्या ग्रामीण भागातून शिक्षक म्हणून नानांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. यावेळी त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या अडचणी जवळून अनुभवल्या, सुविधांच्या अभावामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे पाहून त्यांनी शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. नानांच्या विचारांवर थोर साधू संत- महंत, छत्रपती श्री शिवाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांच्या विचारांचा मोठा पगडा होता. महात्मा गांधीजीच्या विचारा प्रमाणे नानांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी होती. नानांनी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून केवळ शिक्षणाचा प्रसार केला नाही, तर अनेकांना रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिल्या आहेत. नानांच्या ठायी असलेली गोरगरीब विद्यार्थ्यांबद्दलची कणव, दातृत्व आणि आपुलकी यामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार आणि चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे शेकडो आजी-माजी विद्यार्थी आजही नानांना प्रेरणास्थान मानतात. त्यांच्या या कार्यात त्यांच्या सहचारिणी सुदामतीताई वाघ (मोठ्याबाई) यांचेही मोलाचे योगदान राहिले आहे. गोरगरीब वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाई आणि नाना यांनी आपले आयुष्य समर्पित केले आहे. बाई- नाना यांच्या या कार्याची दखल घेऊन समाजातील सुज्ञ नागरिक या दोघांनाही आधुनिक काळातील ‘फुले दांपत्य’ असे संबोधतात. नाना शेवटपर्यंत शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहिले होते. संपूर्ण हयात शिक्षण क्षेत्रासाठी समर्पित करणाऱ्या शिक्षण महर्षी गोविंदराव वाघ उर्फ नानांचे विचार आज क्षणाक्षणाला आठवतात. जीवनात काम करताना खूप अडचणी येतात; मात्र त्यावेळी खचून न जाता खंबीरपणे लढत राहणे हेच यशाचे खरे गमक आहे असे नाना सर्वांना आवर्जून सांगत असत. नाना
आज देहाने आपल्यात सोबत नाहीत परंतु विचाराने कायम आपल्या जवळच आहेत. ‘नानांनी दिलेली प्रेरणादायी शिकवण, विचार आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य आजही आपल्या सर्वांना मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या विचारावर आणि आदर्शावर वाटचाल करणे हीच ख-या अर्थाने नानांना आदरांजली ठरेल अशा शब्दात गणेशराव वाघ सर यांनी आपल्या भावना व्यक्त केला. या कार्यक्रमाला आजी- माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक, यांच्यासह शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
___________________________


